अभूतपूर्व झपाटयाने होणाऱ्या शहरीकरणामुळे संपूर्ण जगाचे सातत्याने नागरीकरण होत आहे. आशिया आणि आफ्रिका या खंडांमध्ये पुढील तीन ते चार दशकांमध्ये नागरीकरणाची सर्वात जास्त वाढ अपेक्षित आहे. नागरीकरणाचा हा जागतिक कल भारतातील औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, तंतोतंत प्रतिवर्तीत झालेला दिसून येतो. सुसूत्र आणि नियोजनबध्द विकासास चालना देऊन महाराष्ट्र राज्य हे रोजगार आणि साधनसंपत्तीमध्ये सर्वाधिक सक्षम करण्यावर माझा कटाक्ष आहे. आपल्या राज्याची नैसर्गिक साधनसामुग्री व क्षमता विचारात घेऊन होणारे नागरीकरण योग्य दिशेने मार्गक्रमण करेल याची मी ग्वाही देत आहे. वरील धोरणाचा एक महत्वाचा भाग म्हणून महाराष्ट्रात विकसित होत असलेल्या अनेक संस्थांपैकी ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ ही एक प्रमुख संस्था आहे. जागतिक आर्थिक पातळीवर भारताची दिमाखदार घोडदौड पाहता महाराष्ट्रास कायम अग्रेसर ठेवताना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महत्वाची भूमिका साकार करावयाची आहे. त्यानुसार प्राधिकरणास सर्वार्थाने बळ देण्यास राज्य शासन कटिबध्द आहे.